Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

महाराष्ट्रातील अनेक चांगल्या वाईट घटनांची साक्षीदार असलेली जेजुरनगरी, श्रीमल्हारी मार्तंडाची राजधानी, इथल्या मातीत अनेक धुरंधर घडले, कित्येक लढले आणि कित्येक पडले सर्वकाही याभूमीने पहिले. या नगरी संदर्भामध्ये उपलब्ध असणा-या पुराव्यांवरून घेतलेला आढावा.



श्रीक्षेत्र जेजुरी

श्रीक्षेत्र जेजुरी, तीर्थक्षेत्र आणि पर्यटनक्षेत्र म्हणून आवश्यक संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ उदा. रेल्वेचे वेळापत्रक, दळणवळण सुविधा, सुविधा, राहण्याची व्यवस्था, कुलाचाराची व्यवस्था इ. संपूर्ण माहिती.

किल्ले पुरंदर

वीर मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाने अजरामर केलेल्या या किल्ल्यावर बिनी दरवाजातून पुढे प्रवेश करताक्षणीच त्यांचा भव्य असा पुतळा दिसतो.पुरंदर व रुद्रमाळ किंवा वज्रगड हे डोंगराच्या एकाच सोंडेवर असले तरी दोन स्वतंत्र किल्ले आहेत. छत्रपती संभाजीराजांचा व सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे,किल्ल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.


कला व संस्कृती

श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनहीप्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभा शाली अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते.

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

श्रीक्षेत्र जेजुरीचा कुलस्वामी खंडेराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत, रंकापासून रावांपर्यंत सर्वांच्या देवघरामध्ये पूजिला जाणारा कुलस्वामी खंडेरायाच्या जेजुरनगरीचे ऐतिहासिक महत्वही अपरंपार आहे. जेजुरीगडावर मिळणारा सर्वात जुना शिलालेख तेराव्या शतकातील आहे तर चैतन्य महाप्रभूंनी १५११ मध्ये जेजुरीला भेट दिल्याचे उल्लेख असलेले ऐतिहासिक दस्त उपलब्ध आहेत. असे अनेक शिलालेख आणि ऐतिहासिक दस्त यांमध्ये जेजुरीचा उल्लेख आढळत असला तरी विसाव्या शतकातील छायाचित्राव्यातिरिक्त जेजुरी संदर्भात चित्र उपलब्ध होत नव्हते. परंतु नुकतेच एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये रेखाटलेले जेजुरगडाचे चित्र लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीच्या संग्रहामध्ये उपलब्ध असल्याची माहिती प्रथमच उजेडात आली आहे. तर दुसरे चित्र १८६२ मधील असल्याची माहिती www.jejuri.in संकेतस्थळावर प्रथमच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यापैकी पहिले चित्र आहे ते १८४४ मध्ये इंग्रज चित्रकार अलेक्झांडर नाश  (Nash, Alexander) यांनी जेजुरगडाचे  विहंगम दृश्य वायव्येकडील होळकर तलावाच्या कडेला बसून रेखाटलेले आहे. जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव बांधला, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत. या तलावच्या पश्चिमेकडील बाजूने पेन्सिलने रेखाटले हे चित्र आहे.
अलेक्सांदर नाश
(Nash, Alexander) हे भारतात आले त्यावेळी बॉम्बे इंजिनिअर्स मध्ये सेवा करीत होते तर १८३६  पासून महसूल खात्यातील दख्खन सर्वेक्षण(Revenue Survey of the Deccan) विभागामध्ये सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) पदावर कार्यरत होते. त्यानंतर १८४१मध्ये त्यांना बढती मिळाली आणि १८४६ पर्यंत अधीक्षक (Superintendent) या पदावर कार्यरत होते. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी काही पेन्सिल रेखाटणे केली त्यामध्ये विजापूर शहरातील १६, पुरंदर किल्ल्यावरील दोन आणि जेजुरगडाचे एक अशी एकोणीस चित्रांचा संग्रह लंडन येथील ब्रिटीश लायब्ररी मध्ये आहे.
सन १८४४-४५ मध्ये जेजुरीतील चित्र रेखाटताना त्यांनी होळकर तलावाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीगडाचे चित्र रेखाटलेले आहे. हे चित्र कदाचित उन्हाळ्यामध्ये रेखाटलेले असावे असे वाटते कारण पावसाळ्यामध्ये होळकर तलाव पाण्याने भरलेला असतो परंतु सदर चित्रामध्ये अर्धा तलाव कोरडा दिसत आहे. होळकर तलावाशेजारी सुभेदार मल्हारराव होळकरांची छत्री असलेले मल्हार गौतमेश्वर मंदिर आहे त्याचे आणि होळकर वाड्याचे रेखाटन केले आहे. जेजुरगडाचे आणि छत्री मंदिराचे प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये उमटलेली दाखविण्याची किमया चित्रकाराने केली आहे. तलावाच्या बाजूला अजूनही अस्तित्वात असलेली चिंचेची बाग या चित्रामध्ये दिसत आहे. जेजुरगडावरील उत्तर दिशेचे महाद्वार आणि पायरी मार्गावरील कमानी तसेच गडावरील मंदिराचे दोन कळस हे चित्र जेजुरीचेच आहे याबद्दल शंका येण्याचे कारण नाही.
या चित्राचे नामकरण करताना चित्रकाराची शब्दोच्चारामध्ये किंवा भाषेतील अंतरामुळे गफलत झालेली दिसते, जेजुरीला 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' किंवा 'देवाची जेजुरी' असे संबो
धले जाते त्याचे एकत्रीकरण करून कदाचित Dejouri (डेजोरी, दिजोरी) असे लिह्ल्यामुळे हे चित्र नक्की कोणत्या स्थानाचे आहे यामध्ये अभ्यासक साशंक होते त्यांनी de आणि ri या अक्षरांवरून हे चित्र देवगिरीचे ( दौलताबाद ) असल्याचे नोंदविले आहे, परंतु किल्ले देवगिरी आणि या चित्रामध्ये कुठल्याही प्रकारचे साधर्म्य नसल्याचे आम्ही www.jejuri.in या संकेतस्थळावर दाखविले.  डेक्कन (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश) या प्रांतामध्ये  डेजोरी किंवा दिजोरी असे कोणतेही स्थान नसल्याचे आमचे ठाम मत आहे. या संदर्भामध्ये ब्रिटीश लायब्ररी कडे संपर्क साधून चित्रातील दृश्याचे विस्तृत विश्लेषण सदर केले आहे.
दुसरे चित्र श्रीमती सारा जेन लायार्द यांनी सन १८६२ मध्ये जेजुरी गावाच्या आग्नेयेकडे आणि जेजुरगडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेशवे तलावावरून जेजुरगडाचे दिसणारे दृश्य जलरंगामध्ये (water colour) काढलेले आहे. चित्राचे नामकरण 'The Hindoo Temple of Jejurie - 1862' असे केले आहे.


भोसले घराणे

वेरूळ गावचे पाटील असलेले भोसले घराणे मालोजी राजे भोसल्यांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले.तेव्हा पासून क-हेपठारच आणि भोसल्यांच अतूट नाते आहे. जेजुरी व श्रीखंडोबा संदर्भात उपलब्ध कागदपत्रांवरून भोसले घराण्याचा घेतलेला धावता आढावा........

शहाजीराजे भोसले

मालोजीराजांची पुणे व सुपे परगण्याची जहागिरी त्यांच्या मृत्यू नंतर वयाच्या पाचव्या वर्षी शहाजी राजांना मिळाली व आपले काका विठोजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कारकीर्द फुलू लागली. पुढील काळामध्ये पराक्रमी शहाजीराजांनी निजामशाही किंवा आदिलशाहीमध्ये स्वकर्तुत्वावर जहागिरी मिळवली व टिकवली होती सुपे परगण्याची जहागिरी बहुतांश काळ त्यांचेकडेच असल्याने क-हेपठारावर त्यांचा नेहमीच वावर होता. जिजाऊ मासाहेब व शिवराय यांचेकडे पुणे प्रांतातील कारभार सोपविल्यानंतर त्यंचा मुक्काम अखेर पर्यंत बंगरूळलाच होता.'

चिटणीसाची बखर' मधील वर्णनानुसार शिवाजी महाराजांची व शहाजी राजांची ऐतिहासिक भेट जेजुरगडावर झाली होती. याभेटीचे वर्णन करताना बखरकार म्हणतो ही भेट ब-याच कालावधीनंतर होत असल्याने प्रत्यक्ष समोरासमोर उरभेट होण्यापूर्वी कास्याच्या परातीमधील तुपामध्ये मुखदर्शन घेऊन मगच प्रत्यक्ष भेट घेतली. या ऐतिहासिक भेटीचे समूहशिल्प जेजुरगडावर नव्याने उभे रहात आहे.


राजमाता जिजाऊ

शहाजीराजांच्या जहागिरीमध्ये जिजाऊ मातुश्री पुण्यामधून कारभार करीत होत्या महसूल वसुली बरोबरच अनेक न्याय निवाडे करणे अशी महत्वपूर्ण कामे त्या करीत असत. महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी  शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. त्यांच्या कर्तुत्वाचा पैलू दाखविणारा असाच एक प्रसंग  श्रीक्षेत्र जेजुरीशी संबंधित न्यायनिवडा मासाहेबांनी केला होता, तो भविष्यात जसाच्या तसा श्रीशिवाजीराजांनी कायम ठेवला होता.

ईसवी सन १६५२ पूर्वी श्रीखंडोबा देवाचे पुजारी, सेवक, हक्कदार यांचेमध्ये तंटा निर्माण झाला होता तो तंटा विकोपास गेल्यानंतर पुण्यामध्ये मातुश्री जिजाऊसाहेब यांचेपुढे भांडण सोडविण्यासाठी अर्ज करण्यात आला. मासाहेबांनी न्यायनिवडा करून सर्व संमत असा निकाल दिला. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी असा कौलनामा दिला होता.




छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तोरणा स्वराज्यात सामील करून घेतला तो विनासायास, ही बातमी विजापूरला आदिलशाही दरबारामध्ये समजली.शहाजी पुत्र शिवा बंडावा करतोय म्हणून त्याचा पुरता बिमोड करण्यासाठी शूर सरदार फत्तेखानाला फौज घेऊन पाठविले व या शूर सरदाराने सन १६४च्या ऑंगस्ट मध्ये आपला डेरा क-हेपठारावर जेजुरी नजीक बेलसर खळदच्या शिवारामध्ये टाकला. त्याची फौज म्हणजे नुसता पसाराच राजांचे सैन्य ते किती महराजांचा एकूण जमाव तीन हजाराहून अधिक होता. गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर, कारीचे बाजी कान्होजी जेध, हिरडस मावळचे बाजी बांदल, कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव देशमुख,वेळवंड खोऱ्यातील बाबाजी डोहर देशमुख हे आपल्या जमावानिशी पुरंदरावर उपस्थित होते याशिवाय राजेंभोवती गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, कावजी मल्हार यांसारखे तरुण रक्ताचे खंदे वीर गोळा झाले.
आता हालचाल केलीच पाहिजे. या उद्देशाने राजेंनी कट-कारस्थान आखण्यास सुरवात केली.कावजी मल्हार यांचे नेतृत्वाखाली राजांनी काही फौज देऊन शिरवळवर धाडले. आणि शिरवळ काबीज केला देखील बाळाजी हैबतरावास कावजीने भाल्याचा प्रहार करून ठार केले. राजेंची पहिली चाल यशस्वी झाली.

आता दुसरी चाल, रात्रीचा फायदा घेऊन फत्तेखानच्या छावणीवरच छापा टाकण्याचा धाडसी निर्णय महाराजांनी घेतला. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी फत्तेखानाच्या छावणीवर छापा टाकला, आदिलशाही फौजेला जाग येण्यापूर्वीच जमेल तेवढे कापून निसटायचेच हा डाव आणि मावळे रात्रीत कापाकापी करत छावणीत घुसले आणि काही कळण्या पूर्वीच पसार झाले. परंतु झेंड्याच्या पथकावर हल्ला चढवून त्यांना कचाट्यात पकडण्याचे काम खानाच्या लष्कराने केले. ज्याच्या हातात निशान होता त्यास तीर लागला व तो आणि त्याच्या हातातील झेंडा कोसळू लागला सगळ्यांची मने डचमळू लागली पण घुसलाच एक मर्द मराठा त्या चक्रव्युहात आणि  खानाचे सैन्य कापून काढत त्याने तो पडणारा भगवा ध्वज सांभाळला, त्यांचे नाव बाजी जेधे, कान्होजी जेधेंचा हा पुत्र रक्तातील निष्ठेपाई हे करण्यास त्यांस भाग पाडले. आणि ही सर्व मंडळी पुरंदरला निघून गेली.
ही लढाई म्हणजे गनिमी काव्याचा पहिला वहिला अध्याय, आणि महाराजांची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथमच न्हाली ती इथे मल्हारी मार्तंडाच्या साक्षीने.

जेजुरी मंदिर संदर्भातील महाराजांचा एक कौलनामा प्रसिद्ध आहे. जिजाऊ मासाहेबांनी मंदिर उत्पन्नाबाबत दिलेला निवडाच कायम ठेवावा असे त्या कौलनाम्यात उल्लेखले आहे. तो कौलनामा.....

शके १५७५ आषाढ वद्य १४
ईसवी सन १६५३ जुलै १३
कौलनामा प्रतीच्चंद्र मु व सी
अजर रा. सिवाजी राजे ---- गुरव पुजारा श्रीमार्तंड भैरव जेजुरी 
गुरवातील मिरासीचा गसगसा होता त्याचा निवडा मातुश्री साहेबी करून सालसा करणे कौल दिधला आहे तेनेप्रमाणे साहेबांचाही कौल असे ......
   रा येसाजी सर खवास.


छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहूराजे यांचे आज्ञापत्र
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शिवशके ५५ ( इसवी सन १७२९)
"म्हाळोजी बिन येसाजी राहणार मौजे जेजुरी तालुका कडेपठार परगणे मजकूर पुढे यांनी मुक्कामी येउनी विनंती केली असे आम्हापासी पूजा उत्पन्न, भंडारा व दक्षिणा व वस्त्रे इत्यादीचा जिन्नस येईल तो आपण घेत आहोत. याखेरीज खारीक खोबरे ,नारळ व जे येईल ते एक तक्षीम पुजारी, एक तक्षीम लांघी व तक्षीम वीर घडशी येणेप्रमाणे तिठाई आपले वडिलांपासून घेत आलेले आहात व हल्ली आपणही घेत आहे. ऐसा वाटा पूर्वीपासून चालत आलेला आहे त्याप्रमाणे महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामींचे पत्र आपणाजवळ आहे ते पाहून सदरहू प्रमाणे स्वामिनी कृपा करून देऊळ वंश परंपरेने चालवायची आज्ञा केली पाहिजे .............
तरी तुम्ही सदरहू प्रमाणे श्रीपाशील उत्पन्न होईल ते ते व पुत्र पौत्रादी वंश परंपरेने वृत्ती चालवणे प्रतिवर्षी नविन पत्राचा आक्षेप न करणे .........................


सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस

थोरले माधवराव पेशवे यांनी मोडलेली मराठा साम्राज्याची घडी पुन्हा बसविली परंतु त्यांच्या अकाली निधनाने पेशवे पदावर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव यांना नेमण्यात आले. या सा-या राजकारणात रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशवे हे दुखावले गेले आणि त्यांनी कट रचून नारायणरावाचा गारद्यांकरवी खून घडवून आणला. पेशवे पदावर हक्क सांगण्यासाठी छत्रपतींच्या सातारा गादीकडे राघोबादादांनी लकडा लावला. परंतु पुण्यातील मुत्सद्यांनी "बारभाईचे राजकारण" केले आणि राघोबादादांना पेशवे पदापासून दूर ठेवले. नारायणराव पेशवेंच्या मृत्यूनंतर त्यांची गरोदर पत्नी गंगुबाईला, कारभारी नाना फडणविसांनी किल्ले पुरंदरवर सुरक्षितस्थळी बाळंतपणासाठी पाठविले. त्याच वेळी क-हेपठारच्या मल्हारी मार्तंडाच्या चरणी नाना फडणवीस शरण आले आणि त्यांनी गंगुबाईच्या उदरी पुत्रप्राप्ती व्हावी आणि त्याची पेशवे पदावर नियुक्त व्हावी यासाठी नवस बोलला. 

जेजुरीचा कुलस्वामी खंडेराया नवसाला पावला आणि १८एप्रिल १७७४ रोजी गंगुबाई प्रसव होऊन पुत्र प्राप्ती झाली. नारायणरावांचे थोरले बंधू कै.माधवराव पेशवे यांच्या नावावरूनच त्याचे नामकरण करण्यात आले. त्यांचा अधिकारकाळ इ.स. १७८२ - इ.स. १७९५ हा इतका होता. मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने सारे काही सुरळीत झाले म्हणून नाना फडणविसांनी जेजुरीच्या मंदिरामध्ये नवसपूर्तीप्रित्यर्थ चांदीचा श्रीखंडोबा म्हाळसा यांचा प्रभावळीसह मूर्ती जोड मार्तंडाचरणी अर्पण केला.
जेजुरगडावरील मुख्य गाभा-यामध्ये जे मूर्ती जोड पहावयास मिळतात त्यापैकी डावीकडील चांदीचा मूर्तीजोड नाना फडणविसांनी वाहिलेला आहे.


सुभेदार मल्हारराव होळकर

दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच.

दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरु केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भोजराज मामाची मुलगी गौतमी बरोबर मल्हाररावचा विवाह संपन्न झाला आणि पुत्र झाला त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीच्या  खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हारबांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.

उत्तरोत्तर मल्हारबाची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा होता, मल्हार आया.. मल्हार आया... गर्जनेने शत्रूची दाणादाण उडत असे. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. मल्हारबांनी अहिल्येवर पुत्रवत प्रेम केले आणि तिच्यावर जबाबदारी सोपविली. १७ मार्च १७५४ मध्ये अघटीत घटना घडली, कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पडले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हारबांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी आकराजणी सती गेल्या.

 

पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हारबांनी मोहिमा उघडल्या, इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरगडावरील नगारखाण्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत कि शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. त्यांच्या याच स्वभावाने घात झाला आणि मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारबांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसे जीव वाचवून बाहेर पडले.

पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांची पहिली पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्यूमुखी पडल्या त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारबा अनेकदा तिच्याशी सल्ला मसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदा-या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

पानिपतनंतर मराठे शाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हार रावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून स्वतःला व्यस्त ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. मराठेशाहीतील आधाराचा गरुड खांब कोसळला, मराठे शोकाकुल झाले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या, पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

 ती व्रतस्थ होती,

पण ती संन्यासिनी नव्हती

जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता,
हुकुमत हा सत्तेचा स्वभाव होता तेव्हा

तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले

तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने,

तळी-अन्नछत्रे-धर्मशाळांचे रूप घेतले 
तिच्या अनाक्रमक धर्म शीतलतेचे मंगल प्रतिध्वनी

भारतखंडाच्या मंदिरा मंदिरातून घुमले

मात्र ती सर्वगुण संपन्न देवता नव्हती,

तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या

अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी या गावी माणकोजी पाटील यांच्या घरी ३१ मे १७२५ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले, तिचे नामकरण अहिल्या असे करण्यात आले. माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकरांचा नऊ वर्षाचा मुलगा खंडेराव याच्या बरोबर आठ वर्षाच्या अहिल्येचा विवाह लावून देण्यात आला. खेड्यातील पाटलाच्या घरातील लहानग्या अहिल्येने इंदौरच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला आणि तिचे अवघे जीवनच बदलून गेले. मल्हारबांच्या पत्नी गौतमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या, व्रत वैकल्ये आणि घरातील कामकाजामध्ये लक्ष घालू लागली.१७ मार्च १७५४ रोजी खंडेराव होळकर कुंभेरी येथे युद्धामध्ये मृत्यू पावले आणि वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी अहिल्येला वैधव्य प्राप्त झाले. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाहीच, शिवाय त्यांच्यातील हुशारी ओळखून राज्यकारभारातील कामकाजात सामावून घेतले व एकेएक जबाबदारी सोपविली गेली.
बारा वर्षांनंतर सन १७६६मध्ये, त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले, त्यांच्या पश्चात अहिल्यादेवींचा मुलगा मालेरावच्या नावे सुभेदारीची वस्त्रे पेशव्यांकडून मिळाली, परंतु वर्षभरातच त्याचा मृत्यू ओढवला. या सर्व वाईट घटना पचवून त्यांनी आपल्या सास-यांनी उभ्या केलेल्या दौलतीचे रक्षण केले. पेशवाईतील काही सरदार मंडळींचा गडगंज श्रीमंत असलेल्या होळकरांच्या दौलातीवर डोळा होता. एकटी बाई काय करणार असा सा-यांचा समज होता. पण राघोबादादा पेशवे यांच्याशीही रणांगणावर दोन हात करण्याची त्यांनी तयारी दर्शविल्यावर मात्र बाईंचे मनोधैर्य उच्च असल्याची प्रचीती सर्वांना आली. त्यांनी,मल्हारराव होळकरांच्या चुलत चुलत नात्यातील तुकोजीराव होळकर यांना मल्हारबांचे वशंज म्हणून, सैन्याची जबाबदारी देण्यात आली.
राज्यकारभार हातात घेतल्यानंतर अहिल्यादेवींनी भारतवर्षात अनेक मंदिरे, नदी तटावर घाट बांधले व त्यांचा जीर्णोद्धार केला. त्या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या, त्यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हणुन ओळखतात. त्यांना भारताच्या,माळवा सुभ्याच्या, होळकर घराण्याची 'तत्वज्ञानी राणी' म्हणुन ओळख
ले जाते. त्यांनी नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. श्रीक्षेत्र जेजुरी मधील पाण्याचे दुर्भिक्ष ओळखून एक भव्य तलाव बांधला, त्याच्या सभोवताली मल्हारी मार्तंडाच्या पूजेसाठी फुले मिळवीत म्हणून माळी समाजाला खंडाने जागा उपलब्ध करून दिली, त्याबरोबरच यात्रेसाठी येणा-या भाविक भाविकांच्या सोयीसाठी चिंचेच्या झाडांची बाग निर्माण केली. जननी तीर्थाचे बांधकाम केले, नजरपेठ वसविली, विठ्ठल मंदिर उभे केले, भाविकांसाठी भली मोठी धर्मशाळा... अशी अनेक कामे आपल्या कुलस्वामीप्रती असलेल्या श्रद्धेतून उभी केली. त्यांच्या मुखामध्ये सदैव मार्तंडाचे नामस्मरण असे.
त्यांना प्रजेचा उत्कर्ष आवडत असे, राजा ती हिसकेल म्हणुन आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. भिल्ल समाज,जो अनंत काळापासुन, डोंगर द-यातून  सामान ने-आण करत असतांना लुटमार करीत असे, त्यांना प्रामाणीकपणे शेती करण्याची संधी देण्यात आली. हिंदू व मुसलमान समाज या दोहोंनाही त्यांची कार्यपद्धती आवडत असे व ते तिच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करत. त्यांना वृद्धपकाळामध्ये सर्वात मोठे दुःख सोसावे लागले ते म्हणजे, जावई यशवंतराव फानसे यांच्या मृत्युनंतर, त्यांच्या कन्येने सती जाणे.
वयाच्या सत्तराव्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. देहरुपाने त्या या जगामध्ये नसल्या तरी चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांच्या समाजपयोगी कामाचे स्मरण प्रत्येकाला जगण्याची दिशा देत राहील.


सुभेदार तुकोजीराव होळकर

सुभेदार मल्हारराव होळकर यांनी उभ्या केलेल्या दौलतीचे वारस म्हणून  त्यांच्या पश्चात माधवराव पेशव्यांनी त्यांचा नातू मालेराव यांस सुभेदार नेमले, परंतु तोही वर्षातच निवर्तला. तोपर्यंत अहिल्यादेवी दुस-याच्या नावाने राज्यशकट हाकत होत्या, पेशव्यांनी त्यांना राज्यकारभारासाठी अधिकृतपणे नेमले. मल्हाररावांच्या दूरच्या नात्यातील तुकोजीराव होळकर यांच्याकडे सैन्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय अहिल्यादेवींनी घेतला. स्वतः महेश्वर मध्ये राहून मुलकी कामे बघत तर तुकोजीराव इंदोर मध्ये राहून सैन्याची कामे बघत असत. तुकोजीराव तो पर्यंत कोणत्याही पदावर नव्हते, ११ डिसेंबर १७६७ च्या श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या एका पत्राने त्यांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांचे वय बेचाळीस वर्षाचे होते. तुकोजीराव स्वतःला मल्हारराव होळकरांचा मानसपुत्र मानत असत, त्यातूनच ते स्वतःचा मल्हारसूत तुकोजी असा उल्लेख करीत, पेशव्यांनी सुभेदार हे पद दोघांपाकी कोणालाही दिले नसले तरी पेशव्यांच्या वकिलासह सर्व जनता त्यांना सुभेदार संबोधित होती.
 सत्तेवर आल्यानंतर मल्हाररावांप्रमाणेच तुकोजीराजेंनी प्रथम जेजुरीच्या कुलस्वामी खंडेरायाचे स्मरण केले. त्यांनी पुणे सरकारकडे जेजुरी येथे वाड्याची मागणी केली त्याप्रमाणे ९ जानेवारी १७६८ मध्ये त्यांना ब्राम्हण आळीमध्ये प न्नास हात लांब व पन्नास हात रुंद एक वाडा देण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले. मल्हारराव होळकरांनी सुरु केलेले जेजुरगडाच्या नुतनीकरणाचे काम तुकोजीराजेंनी नेटाने पुढे चालविले, सन १७७० मध्ये पूर्वेकडील तटबंदीचे काम पूर्ण झाले. इसवी सन १७९० च्या सुमारास मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिराची उभारणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
सततची धावपळ आणि सैन्
याची जबादारी सांभाळत त्यांनी मराठा साम्राज्य वाढविण्याचा आयुष्यभर प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या शेवटपर्यंत तुकोजीराव त्यांच्या शब्दाला मान देत असत, त्यांच्या पश्चात दोन वर्षे त्यांनी होळकर रियासतीचा कारभार एक छत्री सांभाळला. त्यांना औरस पुत्र काशीराव, मल्हारराव तर विठोजी व यशवंतराव अनौरस पुत्र होते, त्यापैकी काशीरावला आपल्या हयातीतच त्यांनी गादीचा वारस म्हणून नेमले होते. १५ ऑगस्ट १७९७ रोजी तुकोजीराजेंचे पुणे मुक्कामी निधन झाले.


महाराजा यशवंतराव होळकर

फक्त एक राजा असा झाला....
शिवराया मागं यशवंतराव एकला..
ज्याचं शाहिरानं नांव गांव
डोक्यावर घेवून नाचावं
इतिहासाला लेण व्हावं
लहानथोरांच्या ओठि राहावं
यशवंतराव ! फक्त एक नांव !

- शाहीर अमर शेख

सुभेदार तुकोजीराजेंचे पुणे मुक्कामी निधन झाल्यानंतर त्यांनी योजल्याप्रमाणे काशीराव गादीचे वारस झाले. शरीराने कृश असलेले काशीराव हलक्या कानांचे होते, सख्खा भाऊ मल्हारराव आपला घात करेल अशी भीती त्यांच्या मनामध्ये होती. दौलतराव शिंदे आणि पेशवे यांनी संगनमताने भांबुर्डयात  होळकरांच्या छावणीवर हल्ला चढविला त्यामध्ये मल्हारराव मारले गेले, तर विठोजी आणि होळकरांचा कुटुंब कबिला कैद झाला. सर्वात धाकटे यशवंतराव मात्र जखमी अवस्थेमध्ये तेथून निसटले आणि जेजुरीला पोहोचले. जेजुरीतील भटजींच्या मदतीने त्यांनी माळव्याकडे कूच केली आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाचा अध्याय सुरु झाला.
यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.  यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या सैन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण शिंद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले.
ब्रिटीशांची कपटनीती अचूक ओळखणारे, त्यांचा वाढत चाललेला पसारा यशवंतरावांनी वेळीच ओळखला आणि संपूर्ण भारतवर्षातील योद्ध्यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरुद्ध लढले पाहिजे यासाठी यशवंत रावांनी जोरदार प्रयत्न केले त्यांना सर्वांनी साथ दिली असती तर पुढचा इतिहास कदाचित वेगळा असता. यशवंतराव होळकर ही मराठी इतिहासानं राष्ट्राला दिलेली देणगी आहे. हातांचा उपयोग परक्या धन्यांच्या समोर मुजरे करण्यासाठी ज्या काळांत लोक करीत होते त्या काळात समर्थपणे समशेर पेलून तिच्या टोकानं इंग्रजांना आव्हान देणारा यशवंतराव हजारो अश्वदळाचा सेनापती. समशेरीप्रमाणेच मुत्सद्देगिरीची ही तलवार चालवणारा राजकारणी. पण त्याच्या उरी एक शल्य होतं. स्वामिनिष्ठेचा एक पारंपारिक पगडा असलेल्या त्या दोनशे वर्षांपूर्वीच्या काळात हा माणूस पेशव्यांनी आपल्याला माळव्याची सुभेदारी अधिकृतपणे द्यावी, त्यांच्या हातून मानाची वस्त्रं मिळावीत म्हणून धन्याच्या पायाशी धरणं धरून बसला. पण त्याला मिळाली उपेक्षा, अवहेलना आणि अपमान.

यशवंतरावांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला, विजयनगर व म्हैसूर राज्यानंतर धनगर राजा होणारे यशवंतराव पहिलेच महाराजा होते, त्यांनी होळकर राज्य स्थापन करून स्वतःचे वेगळे निशाण व राजमुद्रा बनवून घेतली. छत्रपती शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता. जेजुरीतील भटजींनी प्रतिकूल परीस्थीतीमध्ये केलेल्या सहकार्याची त्यांना सदैव जाणीव होती श्रीक्षेत्र जेजुरीशी थोरल्या सुभेदारांपासून होळकर घराण्याचा असलेला ऋणानुबंध त्यांनी कायम ठेवला, जेजुरीमध्ये सुरु असलेली कामे त्यांनी पूर्ण करून घेतली.
वीर लढवय्या सेनानी महाराजा यशवंतराव होळकर यांचे निधन २८-१०-१८११ रोजी झाले. दोनशेव्या स्मृती दिनानिमित्त www.jejuri.in परिवाराच्या
त्यांना वतीने मानाचा मुजरा.


महाराणी इंदिरादेवी होळकर

सन १९४१ ची गोष्ट इंदौर संस्थानच्या महाराणी इंदिरादेवी होळकर या जेजुरीमध्ये देवदर्शन व कुलाचारासाठी आल्या असताना नेहमीप्रमाणे पहाटेच्या अभिषेकासाठी मंदिरामध्ये पोहोचल्या त्यावेळी त्यांच्या लक्षात आले कि, देवाला अभिषेकासाठी जे पाणी येते ते शेजारील विहिरीमधून आणले जाते, ते पाणी अस्वच्छ असल्याने त्यांच्या मनाला ती रुखरुख लागून राहिली. जेजुरगडावरून खाली आल्याबरोबर होळकर वाड्यामध्ये जेजुरी नगरपालिकेच्या अध्यक्ष, अधिकारी आणि नगरीतील वरिष्ठ मंडळींसोबत बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये त्यांनी जेजुरगडावर देवाच्या स्नानासाठी बंद नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदार्भामध्ये अडचणींबाबत चर्चा केली. सदरहू योजनेचा खर्च होळकर सरकार करेल असे आश्वासन दिले, फक्त त्यावरच न थांबता त्यांनी एक हजार रुपयाचा धनादेश नगर पालिकेच्या स्वाधीन केला.
याप्रमाणे नगरपालिकेने, होळकर सरकारच्या मदतीने जेजुरगडावर पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण केली. सदर योजनेचा खर्च सहा हजार सातशे रुपये इतका आला. माननीय ठाकूरसाहेब, इंदौर यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवरून तरी होळकर कुटुंबियांकडून जेजुरीशी संबंधित हे अखेरचे काम असावे असे वाटते. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पासून सुरु झालेला जेजुरीच्या विकासाचा ऋणानुबंध होळकर संस्थान भारत सरकारमध्ये विलीन होईपर्यंत कायम राहिला.


आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक

Jejuri- Umaji Naik मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा श्रीखंडोबा भक्त उमाजी नाईकने इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून त्यांला आद्य क्रांतिवीर असे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमी काव्याने लढत इंग्रजांशी झुंज दिली.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म
पुरंदर किल्ल्याची रखवाली करीत असलेल्या रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये झाला. उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी  हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कु-हाडी, तीरकामठ, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात  घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुस-या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडेरायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झालाच तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला  १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या कारवाया आणखी वाढवल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटोष याने क-हेपठारच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने पाच इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैन्य होते.
१८२४ ला उमाजीने भांबुर्डा येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण  घेतले होते.
 १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोक-या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमजीची माहिती देणा-यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी
मॉकिनटोष दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.
नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.


हुतात्मा हरी मकाजी नाईक

हुतात्मा हरी मकाजी नाईक म्हणजे इतिहासाच्या पानामध्ये दडलेले एक कर्तुत्ववाण व्यक्तिमत्व, आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर थोड्याच अवधीत ब्रिटीश प्रशासनाला सळो की पळो करून सोडले आणि अखेरीस येळकोट येळकोट जयमल्हार च्या जयघोषात हौतात्म्य स्वीकारले. अशा दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा. प्रथमच www.jejuri.inच्या माध्यमातून हरी मकाजी नाईकचे चरित्र जगासमोर आणण्यात आले.हा छोटासा प्रयत्न सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

Hari Makaji Naikक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी १८५७ च्या उठवानंतर इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटीश प्रशासनाला मदत करणा-या धनदांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जाती धर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार न्हावी आणि मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा.
महाराष्ट्राचे वैभव असलेले सह्याद्री वरील गड किल्ले यांच्या रक्षणाची जबाबदारी रामोशी समाजाकडे होती. परंतु इंग्रजांनी गड किल्ले खालसा केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली. टोळीने संघटीत राहून दरोडा टाकायचा व आपली उपजीविका चालवायची असा रामोशी समाजाचा दिनक्रम चालू असताना क्रांतिवीर उमाजीने या दिनक्रमाला वेगळी वाट दाखवून आशेचा किरण दाखविला. परंतु त्यांच्यानंतर रामोशी समाज जुन्याच वाटेने चालू लागला. इसवी सन १८७७ च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली. सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरवात केली व एक बंड उभे केले. या बंडाची दिशा क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रमाणेच होती. ब्रिटीश प्रशासनाला हादरवि
ण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरि मकाजी नाईक.

जिल्हा सातारा खटाव तालुक्यातील कळंबी गावाचा रहिवासी असलेला हरी, धाडसी आणि शूरवीर होता, पूर्व कल्पना देवून धाडसी वृत्तीने दरोडा घालणे ही त्याची खासियत होती. त्याच्यातील धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्याचे कर्तुत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले. क्रांतिवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरीच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देशसेवेसाठी करावयाचे होते व त्याची झळ गोरगरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेऊन फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सह्भागी झाला. बंडाचे पहिले निशाण उभे केले ते २३ फेब्रुवारी १८७९ शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटीश प्रशासनासाठी काम करणा-या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचनचिठ्ठी आणि खतावण्या जाळून टाकल्या आणि गोरगरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. त्यानंतर दावडी निमगाव, पानमळा असे करीत करीत जेजुरी जवळील वाल्हे गावामध्ये ५ मार्च १८७९ रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकार कडून  हरीला पकडून देणा-यास अथवा त्याची माहिती माहिती कळविणा-यास एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा ठाणे अंमलदार अकबर अली यास हरी मकाजी आपल्या कुटुंबीयासोबत नजीकच्याच बावी गावात येणार असल्याची खबर मिळाली. त्याने त्वरेने हालचाली करून वरिष्ठांपर्यंत ही बातमी पोहोचवली आणि इंग्रज अधिका-याच्या नेतृत्वाखाली बावीकडे कूच केले. गावक-यांनी हरी आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण दिले. परंतु गोळीबाराच्या चकमकीत हरीचा सासरा मारला गेला आणि हरी त्याच्या जोडीदारासह जखमी अवस्थेत पकडला गेला. तो दिवस होता १३मार्च १८७९, हरी सोबत त्याच्या घरातील पाच महिला आणि काही गावक-यांनाही अटक करण्यात आली. ब्रिटीश प्रशासनाने जाहीर केलेले एक हजार रुपयाचे इनाम अकबर अली याला देण्यात आले.
हरीला पुण्याला आणून त्याच्यावर खटला चालविण्यात आला व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हरीला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी अत्यंत क्रूरपणे व त्वरित करण्यात आली. इंग्रजांविरुद्ध बंड करण्याचे धाडस परत कोणत्याही रामोशी समजातील लोकांनी करू नये म्हणून जाहीर फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवती अमावस्येला
रामोशी समाजातील प्रत्येक घरातील एकाने तरी सोमवती यात्रेसाठी जेजुरीला हजेरी लावण्याची पूर्वपरंपरा असल्याने या यात्रेला रामोशांची गर्दी होणार हे ओळखून जेजुरीला पालखी मार्गालगत फाशी देण्याची जागा निवडण्यात आली. भर सोमवती दिवशी दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात हरीला फाशी देणार असल्याची दवंडी पिटण्यात आली. आणि सशस्त्र पोलीस गराड्यात अनेक रामोशांच्या डोळ्यादेखत ०४ एप्रिल १८७९ रोजी वडाच्या झाडाला लटकावून फाशी देण्यात आले. उमाजी प्रमाणेच हरी श्रीखंडेरायाचा जयजयकार करत फासावर चढला.
Hutatma Smarak
हरी नंतर त्याचा भाऊ तात्या मकाजी आणि रामा कृष्णा नाईक यांनी काही काळ उठाव केला, परंतु ते फार काळ हे कार्य करू शकले नाहीत. देशासाठी हरी फासावर चढला परंतु त्याच्या पश्चात त्याचा विसर सर्वांनाच पडला. आज ते वडाचे  झाडही अस्तित्वात नाही आणि हरीच्या हौतात्म्य स्मृती जपण्याची गरजही कुणाला उरली नाही. सरकार दरबारीही सारेच अलबेल आहे. महाराष्ट्र शासनाने हुतात्मा स्मारक उभे करून हरी मकाजीच्या स्मृती जगविण्याचा अल्पसा प्रयत्न केला पण त्याने काही साध्य झाले असे वाटत नाही. वाम मार्गावर चालणा-या हरीने देशासाठी आपला मार्ग बदलला आणि हौतात्म्य स्वीकारले, आणि आम्हाला मात्र त्याच्या कार्याचा विसर पडावा यासारखे दुसरे कोणते दुर्दैव नाही. मल्हारभक्त असलेल्या क्रांतिकारक हरी मकाजी नाईक यांना  www.jejuri.in परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा .

काव्य सुमनांजली


ऐक सांगतो इथेच गेला हरी मकाजी फाशी
रामोश्यांचे नगर जेजुरी हिच आयोध्या काशी
सोमवतीची रामोश्यांची वारी पूर्वापार
म्हणुनी निवडला फाशीसाठी सोमवतीचा वार

जुने पुराने झाड वडाचे डाक बंगल्यापाठी
तेच निवडले हरी मकाजी फाशी देण्यासाठी
दिली दवंडी यात्रेमध्ये फिरून चौफेर
आज नाईक हरी मकाजी फासावर जाणार

अथांग जन समुदाय लोटला गर्दी अपरंपार
आणि उडाला रामोशांच्या डोळ्यातून अंगार
सहस्त्र मुखांनी एकच केला प्रचंड जयजयकार
हरी मकाजी फाशी गेला गर्जत जयमल्हार

लटकत होता देह अचेतन हरी मकाजीचा
खडा पहारा आणि भोवती गो-या सोजिरांचा
कळंबी गावच्या रामोश्याचा वंश धान्य झाला
भारतमाते तुझ्याचसाठी हरी हुतात्मा झाला

--
यशवंतराव सावंत. जेजुरी.


खंडा

जेजुरगडावर सोनोरीच्या पानसे सरदारांनी नवसपूर्ती नंतर कुलस्वामी खंडेरायास साधारणपणे एक मण वजन असलेली तलवार (खंडा) व कासवाच्या पाठीची ढाल अर्पण केली होती त्यापैकी ढाल वीस पंचवीस वर्षापूर्वी गहाळ झाली, मात्र खंडा अजूनही मंदिरामध्ये पहावयास मिळतो. तलवारीचे वजन ४२ किलो तर उंची ४ फूट व रुंदी चार इंच आहे. तलवारीवर मुठीच्या वरील बाजूस पात्यावर कोरीव लेख दिसतो त्यामध्ये महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे अशी नावे दिसतात.
 हा खंडा उचलण्याच्या तसेच कसरतीच्या स्पर्धा मर्दानी दस-याच्या दुस-या दिवशी होतात.



शिलालेख

जेजुरी मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धार वेगवेगळ्या कालावधीमध्ये झाले असल्याने मंदिरामध्ये अनेक शिलालेख सापडतात.त्यापैकी काही शिलालेख सुस्थितीतआहेत तर काहींचे अस्तित्व नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे.मंदिरातील एक जैन शिलालेख सोडला तर बाकी सर्व शिलालेख प्राकृत मराठीतील  आहेत. मंदिरातील मध्य गर्भगृहातून मुख्य गर्भगृहामध्ये जाताना दरवाजाच्या उजव्या बाजूला संगमरवरी मूर्ती दिसते त्याच्या खालील भागात एक शिलालेख आहे तो संवत १३०३ शके ११६८ ( इसवी सन १२४६ ) मधील आहे " धउल्लकाने आत्मकल्याणासाठी कपर्दी यक्षाची प्रतिमा केली."
मंदिराच्या दर्शनी भागात एक शिलालेख आहे त्याप्रमाणे राघो मंबाजी खटावकरांनी सदर व मंडपाचे काम सुरु केल्याचा शके १५५७ ( इसवी सन १६३५ ) मधील आहे तर गडाच्या दक्षिणेकडील ओवा-यांवर शके १५५९  ( इसवी सन १६३७ ) मधील कामे पूर्ण केल्याचा उल्लेख आहे.भंडार गृहाच्या दर्शनी भागावर शके १६७८ मध्ये श्रीगोंदेकरांनी निर्माण केल्याचा उल्लेख आहे तर पंचलिंग मंदिर दरवाजावर विठ्ठल शिवदेव विंचूरकरांनी ( सासवडकर ) शके १६११ मध्ये उभारल्याचे शिलालेख आहेत.होळकर घराण्याची  कुलस्वामी खंडेरायावर अपार भक्ती असल्याने जेजुरगडाचे वैभव वाढविण्यात  सिंहाचा वाटा आहे. पश्चिम, उत्तर व पूर्वेकडील तटबंदीवर होळकरांचे शिलालेख आढळतात.

 

Bookmark and Share